Ahilyadevi_holkar|लोकमाता_महाराणी_अहिल्यादेवी_होळकर

 लोकमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर





अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंड़ी येथे ३१ मे १७२५ रोजी झाला. तर निर्वाण १३ ऑगस्ट १७९५ रोजी झाले. त्या सुभेदार मल्हारराव होळकरांच्या सुनबाई म्हणजे राजे खंडेराव यांच्या पत्नी होत्या. दिनांक १७ मार्च १७५४ ला कुंभेरीच्या लढाईत राजे खंडेराव यांचा मृत्यू झाला. एक पराक्रमी योद्धा म्हणून खंडेरावांनी त्या काळात मोठा लौकिक मिळवला असला तरी इतिहासकारांनी मात्र त्यांची अकारण बदनामीच केलेली आहे. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हार बाबांनी आपल्या सुनेला म्हणजे माता अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. एवढेच नाही तर आपल्या विधवा सुनेच्या हाती राज्य कारभार देऊन जगाच्या इतिहासात कुठेच न घडलेले होळकरशाहीत घडवून दाखवले . होळकरशाहीचा कट्टर शत्रू  माल्कमने अहिल्यादेवींबद्दल  पुढील उद्द्गार काढले आहेत. अहिल्याबाईनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजादक्ष प्रशासन केले त्याला जगात तोड़ नाही. केवळ माळव्यातच नव्हे तर जिथे त्यांची राजवट नव्हती अशा सबंध हिन्दुस्थानातील प्रजा तिला दैवी अवतार मानते,याचे कारण म्हणजे अहिल्याबाईचे प्रजेवरील प्रेम आत्मशुद्धता व विकासाची कायम धडपड होय".प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. 

     एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. 

       माल्कमच नव्हे तर असंख्य युरोपियन इतिहासकारांनी भले येथील राज्यकर्त्यांचे वाभाडे काढले असतील, पण अहिल्यादेवींवर लिहितांना   आपल्या आदरभावनेला मुक्तद्वार दिले आहे. डॉ. अनी बेझंट म्हणतात भारत देशाची खरी सुपुत्री म्हणजे अहिल्यदेवी होय, कारण ती नुसती प्रजहितपालक नव्हती तर राष्ट्राचे ऐक्य आणि राष्ट्रभावनेला जतन करत सर्वत्र आपल्या खाजगीतुन समाजकार्य करणारी एकमेव राष्ट्रमाता आहे. ज्यावेळी संपूर्ण जगात स्त्रियांचे पारतंत्र्य होते त्याकाळात मातेने आपले कर्तुत्व सिद्ध केले . पाचशे महिलांची फौज निर्माण केली. महेश्वरला मुलींच्या शिक्षणाची सोय केली. संपूर्ण भारतभर मंदिरे, घाट,अन्नछत्रे निर्माण करून जनतेची सेवा केली. मातेची २८ वर्षाची राजवट म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्याचा भारतव्यापी विस्तार होय. 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

जय मल्हार 

जय आहिल्या

मराठी_बोधकथा|Marathi_stories

आजचा सुविचार - परोपकार हाच खरा परमार्थ आहे 


आजची बोधकथा - अतिलोभ

       एक रामपूर नावाचे गाव होते.त्या गावात एक भिकारी रहात होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी शंकराची पुजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. शंकर प्रसन्न होतो.


शंकर त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांबवतो

त्या पैशातून तो घर,शेती,गाडी विकत घेतो.तेव्हा

त्याला एक शेजारी विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. शंकराला प्रसन्न करतो. शंकर त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर शंकरही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही. 

तात्पर्य - अतिलोभ माणसाला भिकारी बनवतो

16 मराठी_बोधकथा Marathi_Bodh_Katha

आजचा सुविचार - नम्रतेसारखा दुसरा गुण नाही .

आजची बोधकथा - सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय

एक आटपाट नगर होतं  त्या नगरात माता महालक्ष्मीचे एक मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले महालक्ष्मी मातेला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत.


गावात धनुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. धनुशेट आपल्या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की धनुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल सगळे मिळून धनुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्या पेढीवर आलेले पाहून धनुशेटला खूप आनंद झाला.

त्यांनी भक्तांचा मोठा आदरसत्कार केला. लोकांनी महालक्ष्मी मातेसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व धनुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर धनुशेट म्हणाले, "मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करु शकत नाही कारण मी महालक्ष्मीला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे." लोक म्हणाले आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. धनुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्हा धनुशेटच्या पेढीवर गेले असता धनुशेटच्या शेजारी एक लहान मुलगी बसली होती.


धनुशेटने त्या मुलीला उठायला सांगितले. त्या मुलीला दोन्ही पाय नव्हते. मग धनुशेटच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या ते कृत्रिम पाय होते ते त्या नोकराने त्या अपंग मुलीला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. धनुशेट म्हणाले, " भक्तांनो, या मुलीचे नाव लक्ष्मी, ही अपंग असून अनाथ आहे.

पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून ती आता हिंडू फिरु शकते. त्या महालक्ष्मी मातेला मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता पण या लक्ष्मीला पायांची गरज होती. मी हिला दिलेले कृत्रिम पाय हीच्या दृष्टीने सोन्याचांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत."


तात्पर्य - जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा.

मराठी_बोधकथा|Marathi_bodhkatha 15

 आजचा सुविचार - सत्कार्यापेक्षा सहकार्य महत्वाचे असते.

  आजची बोधकथा - बळी तो कान पिळी



एक जंगल होतं .त्या जंगलामध्ये खूप प्राणी राहत होते. एकदा त्या जंगलामध्ये भयंकर साथीची लाट सुरू झाली आणि हजारो प्राणी पटापट मारू लागले. त्या प्राण्यांना वाटायला लागलं, की आपण फार पाप केलं, त्यामुळे देवाने कोप केला आणि सर्व प्राणी मरू लागले आहेत.मग आपली वाईट कृत्य कबूल करायचे त्या सर्वांनी ठरवले. आणि जो सर्वात मोठ पाप करेल त्यानं देवाच्या कोपाला शांत करायचं आणि बळी जायचं असं ठरलं मग एक सभा बोलवण्यात आली. सर्वजण त्या सभेसाठी हजर झाले. आता न्यायाधीश कोणाला निवडायचं मग सर्वांनी न्यायाधीश म्हणून एका लांडग्याची निवड केली.प्रथम जंगलचा राजा सिंह त्यांनी पुढे होऊन कबुली दिली. मी फार गरीब शेळ्यांना ,मेंढ्यांना ठार मारल एवढेच नव्हे तर फार भूक लागली म्हणून एका माणसालाही ठार मारून खाल्लं. त्यावर न्यायाधीश महाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले सामान्य प्राण्यांनी अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता पण आपण राजे आहात इतरांपेक्षा महाराजांना जास्त सवलती असतात त्यामुळे हा काही मोठा अपराध नाही.या निकालामुळे सर्व प्राण्यांनी लांडग्याची वाहवा केली.यानंतर अस्वल,चित्ता, वाघ सर्व प्राण्यांनी आपापल्या कबुली दिल्या. लांडग्याने सर्वांचा निकाल दिला आणि सर्वांना माफ करून टाकलं शेवटी एक गाढव पुढे आलं ते म्हणाले मी एका शेतकऱ्याच्या जमिनीतलं एक पेंढी भरून हिरवं गवत खाल्लं आणि म्हणून मला पश्चाताप होते त्यावर न्यायाधीश महाराज कडाडले अरे तू खूप मोठे पाप केले तुझ्या पापा मुळेच हा सध्या साथीचा रोग पसरलेला आहे याला ठार मारण्याची शिक्षा दिलीच पाहिजे असा निकाल लांडग्याने दिल्याबरोबर सगळ्यांनी त्याला ठार मारलं बिचाऱ्या गाढवाला ठार मारून टाकलं. 

तात्पर्य - बळी तो कान पिळी